gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

gjc-tilak-abhivadan-yatra-2022

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे त्यांच्या १६६व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिवर्षी दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाचे जवाहर क्रीडांगण ते टिळक जन्मस्थानापर्यंत अभिवादन यात्रेचे आयोजन करून अभिवादन केले जाते. अभिवादन कार्यक्रमाचे हे १६वे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्कृत विभागातील आर्या मुळ्ये, श्वेता सावंत, गौरी सावंत, चिन्मयी सरपोतदार, सिद्धी ओगले, वरदा बोंडाळे, सायली ताडे, सिद्धी कोळेकर या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनिंनी गीतेचा बारावा अध्याय ‘भक्तियोग’चे पठण केले. त्यानंतर जीजीपीएसच्या पल्लवी घाणेकर, धनश्री वैश्यंपायन, तीर्था पावसकर, नेहल नेरुरकर, वैष्णवी बाष्टे यांनी गीतकार श्री. प्रतापसिंह चव्हाण यांनी रचलेले आणि संगीतकार श्री. विजय रानडे यांनी संगीतबद्ध केलेले ‘रात्नाभूमी ही पावन सुंदर’ हे गीत सदर केले. त्यानंतर त्यांनीच ‘हम करे राष्ट्र आराधन’ आणि ‘जननी मेरी जन्मभूमी’ ही देशभक्तीपर गीते सदर केली. यावेळी त्यांना पार्थ खालगावकर यांनी तबला तर विजय रानडे यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली. याप्रसंगी श्री. महेश सरदेसाई यांनी पारंपारिक वेशात लोकमान्यांना आरती व ओवाळणी केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांचे योगदान खूप मोठे असून लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत झाला, लेखन आणि कृतीतून त्यांनी राजकीय, सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा पाया रचण्याचे कार्य टिळकांनी केले. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असे होते. यावेळी त्यांनी टिळकांचे गणितज्ञ, संशोधक, खगोलशास्त्रज्ञ, पत्रकार, राजकारणी, विचारवंत असे विविध पैलू उलगडून दाखवले. लोकमान्यांचे विचार आणि कार्याचा वारसा रत्नागिरी शिक्षण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय निश्चितच पुढे नेईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उद्योजक श्री. आनंद भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, कार्यक्रम समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. डी. गनी आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, पुरातत्व खाते, भिडे आणि जोशी कुटुंबीय, श्री. प्रसाद गवाणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रा. तेजश्री भावे यांनी ऋतुजा टेंभे-जोशी विरचित लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. उद्योजक भिडे परिवाराकडून उपस्थितांना मिठाईवाटप करण्यात आले.

gjc-tilak-abhivadan-yatra-2022
gjc-tilak-abhivadan-yatra-2022
Comments are closed.