gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम संपन्न

matdar-vishesh-punrikshan-karyakram-2022

भारताने लोकशाही शासनपध्दतीचा स्वीकार केला असून, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे भारतीय मतदारांचा मोलाचा सह्भाग आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत हातभार लावला पाहिजे, असे आवाहन रत्नागिरीचे मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी नवमतदार विद्यार्थांना केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय संविधानाने १८ वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला असून, मुक्त, खुल्या आणि नि:ष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा आधार असतात. निवडणुकांच्या संचलनाची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दरवर्षी आयोगामार्फत अद्ययावत मतदार यादी तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या तरुण व पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदारनोंदणी करता यावी या हेतूने नवमतदार नोंदणी अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्या वतीने गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले, मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरु असते. नवमतदार विद्यार्थांनी स्वतः नोंदणी करून, आपल्या परिसरातील नागरिकांमध्येदेखील मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी जनजागृतीचे कार्य राष्ट्रीय कार्य म्हणून करावे आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी हातभार लावावा.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे यांनीविद्यार्थांना मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची पार्श्वभूमी, निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम इ. ची माहिती देऊन त्यांनी विद्यार्थांना मतदान नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा याहेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रणव गोडबोले ( अभ्यंकर –कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय) याने प्रथम क्रमांक, प्रणवानंद सावंत, सुजित फडके, चिन्मयी सावंत, सबा सावकार, तनिशा भारती (गोगटे – जोगळेकर महाविद्यालय) यांनी द्वितीय क्रमांक तर संपदा महाबळ आणि भूषण भाटकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

याप्रसंगी व्यासपीठावर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्यायशस्वी आयोजनासाठी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील, गणित विभागाचे प्रा. गोविंद दाते, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात तहसील कार्यालयातील कर्मचारी श्री. परिमल डोर्लेकर आदीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, या नवमतदार महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणिआभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले.

Comments are closed.