gogate-college-autonomous-logo

स्वामी स्वरूपानंद राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीला तर राणी पार्वतीबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीला सांघिक पारितोषिक; स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

swami-swaroopanand-state-level-debate-com

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री. स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी संपन्न झाल्या. या आंतरराज्य महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात श्रेयस दीपक सनगरे (रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई) याने तर कु. श्रेया उमेश कुलकर्णी (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा, कुडाळ) हिने कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. स्पर्धेचा सांघिक चषक वरिष्ठ गटात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने तर कनिष्ठ गटात राणी पार्वतीबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या महाविद्यालयांनी पटकावला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सामिनार हॉल येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार श्री. धनंजय चितळे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, स्पर्धा संयोजक प्रा. डी. आर. वालावलकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले. प्रमुख अतिथी श्री. धनंजय चितळे यांनी आपल्या मनोगतात समर्थ रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या उदबोधक साहित्याचा समकालीन संदर्भ व महत्व आपल्या शैलीने व ओघवत्या वाणीने स्पष्ट केले आणि संत वाड्मयाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय समारोप करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या दृष्टांत देण्याच्या शैलीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वामींचा भक्तिरूपी वारसा जपण्याचे कार्य सर्वांनी केले पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थीही स्वामींचे अध्यात्मिक विचार उत्तमरित्या प्रसारित करत आहेत. कोणत्याही काळात हे विचार लागू होतात. या स्पर्धेला लाभलेला उत्तम प्रतिसाद ही बाब खुप महत्वाची आहे; असे सांगून त्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सर्व स्पर्धक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- कनिष्ठ महाविद्यालय गटात वैयक्तिक प्रथम क्रमांक कु. श्रेया उमेश कुलकर्णी (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा, कुडाळ); द्वितीय क्रमांक कु. श्रावणी प्रशांत कुलकर्णी (विलिंग्टन महाविद्यालय, सांगली) आणि तृतीय क्रमांक कु. वर्षा योगेश काळे (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) यांना तर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक कु. रेडकर ऐश्वर्या हेमंत (राणी पार्वतीबाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी); द्वितिय पारितोषिक कु. साक्षी संतोष चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल आणि तू. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा); वरिष्ठ महाविद्यालय गटात वैयक्तिक प्रथम क्रमांक श्रेयस दीपक सनगरे (रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई), द्वितीय क्रमांक कु. आचार्य ऐश्वर्या विज्जल (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) आणि तृतीय क्रमांक आठवले आशिष अनिल (श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी) यांना तर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक कु. नार्वेकर सिद्धी अरुण (पटवर्धन महाविद्यालय, रत्नागिरी), द्वितिय पारितोषिक कु. लीना महेंद्र गुरव (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) हिला तर सांघिक विजेतेपद गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी तर कनिष्ठ गट उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून प्रा. केदार मसकर यांना तर वरिष्ठ गट उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून प्रा. जयंत अभ्यंकर यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आहे.

सकाळी पार पडलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावसचे श्री. विजयराव देसाई, श्री. प्रकाशराव जोशी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजयराव साखळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, स्पर्धा संयोजक प्रा. डी. आर. वालावलकर, प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रा. सुनील गोसावी, श्री. सुकांत चक्रदेव, परीक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे १५वे तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. राज्यातील तरुण पिढीची सांगड अद्यात्म, नैतिकता आणि समाजविकास या प्रश्नांशी घालावी या उद्देशाने स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांची या स्पर्धाच्या आयोजनामागील प्रमुख भूमिका आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडाविषयक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा घेताना हे महाविद्यालय सातत्याने आघाडीवर राहिले आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अॅड. विजयराव साखळकर यांनी वक्तृत्व ही एक उत्तम कला असून आपल्या व्यक्तीमात्वाची छाप पडण्यास ही कला नेहमी उपयोगी पडते असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

आभारप्रदर्शन स्पर्धा संयोजक प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

Comments are closed.