gogate-college-autonomous-logo

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यानिमित्ताने उद्भोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. सोनाली कदम, उपप्राचार्या विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक अनिल उरुणकर, कोतवडे दत्तक गावाच्या महालक्ष्मी सेवा मंडळ, मुंबईचे खजिनदार आणि ग्रामस्थ श्री. अरविंद बारगोडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाल्यानंतर प्रा. निनाद तेंडूलकर यांनी मागील वर्षीच्या विविध कार्यक्रमांची ध्वनिचित्रफीत सादर केली.

प्रमुख पाहुण्या आणि वर्गाच्या मार्गदर्शिका डॉ. सोनाली कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ‘समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. या विभागातील विविध उपमामधून स्वयंसेवकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. स्वचा विसर पडून आपण समाजाचा विचार करू लागतो आणि हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आहे’ असे त्यांनी पुढे नमूद केले.

ग्रामस्थ प्रतिनिधी श्री. अरविंद बारगोडे यांनी शिबिराच्यावेळी आपुलकीचे नाते तयार होत असते असे सांगून राष्ट्रनिर्माण कार्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

उपप्राचार्या विशाखा सकपाळ यांनी तुमच्यातील उर्जा टिकवून ठेवा आणि सामाजिक भानही जपा असे सांगून राष्ट्रीय सेवा योजना गीताचा अर्थ समजून घ्या आणि पुढील आयुष्यात त्यातील गोष्टींचा अवलंब करा; तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीतून राष्ट्रीय सेवा योजनेची ओळख होणार आहे असे नमूद केले.

सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. माधवी लेले, प्रा. क्षमा पुनस्कर आणि स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरभी नाडकर्णी आणि वृषभ जाधव तर आभारप्रदर्शन समीक्षा जोशी यांनी केले.

Comments are closed.